माझ्याविषयी संभ्रम निर्माण केला जातोय
राजू शेट्टी यांचा खुलासा : भाजपाची कितीही मोठी ऑफर आली तरी जाणार नाही
कोल्हापूर / प्रतिनिधी
शेतकरी चळवळीसाठी मी कायमच कार्यरत राहणार आहे. मला भाजपाकडून ऑफर आल्या असल्याच्या बातम्या येत आहेत. हे केवळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे. माझ्याविषयी अशा वेळवेगळ्या बातम्या पेरल्या जात आहेत. प्रत्यक्षात कोणीही माझ्याबरोबर चर्चा केली नाही. असा खूलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी यांना भाजपाची ऑफर आली असून वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आहे अशा बातम्या येत आहेत यावर शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीला येऊन भेटण्याचा काही लोक आग्रह करतात पण यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही काही जागा सुटल्याच्या चर्चा आहेत पण आम्ही महायुती किंवा महाविकास आघाडीकडून मते मागणार नाही. आम्ही केवळ चळवळीसाठीच काम करणार आहे. कारण आघाडी किंवा युतीची सरकारे दिलेली आश्वासने पाळत नाही.
शेतकरी कर लावण्याच्या विषयावर ते म्हणाले की शेतीची धोरणे कृषी भवन मध्ये बसून ठरवली जातात. त्याला निती आयोगाचे काही लोक सल्ला देतात. या विद्वानांचा आणि शेतीचा काहीएक संबध नाही. शेतकरी कर भरण्याच्या स्थितीत असता तर शेतकरी आत्महत्याच घडल्या नसत्या. एकूण ८५ टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे. केवळ १५ टक्के शेतकऱ्यांकडे जास्त शेती आहे पण त्यातही बरीच बंजर, पड आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर कर लावणे योग्य नाही . हा शहरी मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.