कंत्राटी विज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु
कोल्हापूर : विविध पातळ्यावर निवेदने, द्वारसभा घेऊनही सरकारने दखल न घेतल्याने आजपासून राज्यभरातील कंत्राटी विज कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेले महिनाभर जिल्हाधिकारी, सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन दिली, दोन दिवसिय धरणे आंदोलने केली पण या सर्वांची शासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही परिणामी आजपासून सर्व कंत्राटी विज कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील ४२००० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेले १५ ते २० वर्षे हे कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करत आहेत पण अजूनही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या पगारात ३० टक्के वाढ व्हावी, रिक्त पदांवर गरजेनुसार काम करत असलेल्या कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, कर्तव्यावर असताना कंत्राटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना ४ लाखाची मदत जाहीर झाली आहे त्यात वाढ करुन ती १५ लाख करण्यात यावी, अपघाती विमा व कुटुंबियांना ५ लाखापर्यंत आरोग्य विमा मिळावा. झालेली सेवा विचारात घेऊन ग्रॅच्युईटी मिळावी, सेवानिवृत्त कत्रांटी कामगाराच्या वारसास त्याच जागेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक मिळावी. इत्यादी मागण्या विज कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु आहे.