कोल्हापूर : विद्यमान महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्याची मोहीम बुधवार दि. 9 मार्च 2022 पासून सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.
योजनांची माहिती जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या निवडसूचीतील तीन सर्वोत्कृष्ठ कलापथकांची निवड करण्यात आली आहे. कोरोना महामारीची साथ असताना महाविकास आघाडी शासनाने दोन वर्षात विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले आहेत. रात्रीचा दिवस करून कोरोना महामारीत शासनाने नागरिकांना सेवा दिली. लागणाऱ्या क्षमतेपेक्षा ऑक्सिजन निर्मिती केली. कोरोना लसीकरण करून नागरिकांच्या जीविताची देखभाल घेतली. शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा आणि आपत्तीच्या काळात मदतीचा हात दिला.
जिल्ह्यातील 63 गावात कलापथक आपल्या कलेच्या माध्यमातून शासनाने दोन वर्षात जनकल्याणकारी घेतलेल्या निर्णयाची माहिती पोहोचविणार आहेत. कोविड संदर्भात आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडील सर्व सूचनांचे पालन करुन, आवश्यक खबरदारी घेऊन कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार असून हा जागर 17 मार्च 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.