मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँगेस पक्षसदस्यत्वाचा व आमदारकीचा राजिनामा दिल्याने सोमवारी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जन्मा- पासून काँगेसबरोबर आहे. आता वेगळा विचार करणार आहे. कोणत्याही गोष्टीचे कारण देता येत नाही. येत्या दोन दिवसात पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चव्हाण यांच्या राजिनाम्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी हाय कमांडकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टिका केली आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसमधील आणखी काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दौऱ्याला महत्व आले आहे.