जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार
विधानसभा अध्यक्षांकडून घोषणा : जरांगेंविरोधात भाजप आमदार आक्रमक
मुंबई : मराठा आंदोलनामूळे सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. त्यात रविवारी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. याचे पडसाद आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. भाजप आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले जरांगे यांच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे का ? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली. गोंधळ वाढल्यानंतर काहीवेळे कामकाज तहकूब होते. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाबद्दल मी काय केले आहे. हे महाराष्ट्राला माहिती आहे, मी मुख्यंमत्री असताना आरक्षण देऊन ते कोर्टात टिकवले. सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. मराठ्यांसाठी मी काय केले हे सांगण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. माझ्याविषयी ते बोलले पण मराठा समाज मात्र माझ्या पाठीमागे राहिला आहे. मला त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही पण त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे शोधायलाच हवे. आता विधान- सभा अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत त्याचे निश्चित पालन होईल. असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात काहीतरी भंयकर घडवण्यासाठी कट रचला जातोय, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यामागे कोणाचा हात आहे. कोण कटकारस्थान करतोय का ? तसेच महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कोण करत असेल तर त्याविरोधात आमच्याबरोबर विरोधकही उभे राहतील असा आमचा विश्वास आहे. पण याविषयी सदनात बोलनार नाही तर कुठे बोलणार असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
त्यांनंतर काँगेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेत विजय वडेड्डीवार यांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.