प्रधानमंत्री पीक विमा योजना : शेतकऱ्यांसाठी लाभदायी
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये 1 जुलै 2022 पासून राज्यात अधिसूचित क्षेत्रातील खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, नाचणी, भुईमुग आणि सोयाबीन या पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी असून शेतकऱ्यांना विमा सहभागासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 व 8 अ चा उतारा, बॅंक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व स्वयंघोषणापत्र इ. प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
पीक विम्यासाठी एच डी एफ सी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कंपनीचा टोल फ्री क्रमांक 180066 0700 असा आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सर्व संबंधीत विमा कंपनी प्रतिनिधी, वित्तीय संस्था, ग्रामस्तरावरील कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा.